Monday, January 20, 2014

१. दादरा व नगर हवेली सशस्त्र मुक्तीसंग्राम.

            १. दादरा व नगर हवेली सशस्त्र मुक्तीसंग्राम.


     रोमांच ! होय अक्षरशः काटाच उभा राहिला अंगावर ! आणि का नाही उभा राहणार ? प्रत्यक्ष शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सांगत होते . आणि आम्ही ऐकत होतो . याची देही याची डोळा अनुभवलेला अद्बूत प्रसंग . अविस्मरणीय क्षण . भारतीय स्वातंत्र्योत्तर लढ्याचे एक लखलखते तेजस्वी पान .
     आझाद हिंद सेनेने स्वातंत्र्य युद्धाचे एक सोनेरी पान लिहिले होते . आपण कोहीमाला गेलो  तर तेथे तो स्तंभ आपल्याला दिसत असतो  . त्यावरील ओळी दिसत असतात . आपण वाचत जातो . त्या काळात प्रवेश करीत जातो . आणि आपला पुरुषार्थ  लख्खपणे समोर उभा रहातो.
When you go home,
Tell them of us and say.
For your tomorrow,
We gave our today.
     दोन ऑगस्ट ची पहाट .  झुंजूमुंजू झालेले न झालेले ! वापिचे रेल्वे स्टेशन . सुनसान, कोणीही नसलेले . डोळ्यात बोट घातले तरी काळोखालाही न दिसणारा अंधार ! आणि ढगाचे जणू दोन तुकडे झाल्याप्रमाणे धो धो कोसळणारा पाऊस ! सोबतीला विजांचे रौद्र संगीत ! भीषण ! भयप्रद !
     लहानशी शिट्टी जाणवेल न जाणवेल अशी . धुराचा लोट पावसात मिसळत रेल्वे आली . थांबली . खाणाखुणा झाल्या आणि  काहीजण दबत दबत रेल्वेत मिसळले . आपापली शस्त्रे सांभाळत . कोसळणाऱ्या पावसालाही कळू न देता .
      १९५४ भारत स्वतंत्र होऊन सात वर्षे झालेली . ब्रिटीश निघून गेलेले .  पाठोपाठ फ्रेन्चांनीही गाशा गुंडाळलेला . पण पोर्तुगिज गोचीडा सारखे डसलेले . भारतमातेचे रक्त शोषण्यात धन्यता मानलेले . हे गोचीड उपटायचे . मुळासकट फेकून द्यायचे . ४९१ स्क्वेअर  मिटरांचा हा भारतीय प्रदेश मुक्त करायचा . आणि म्हणूनच हा दादरा व नगर हवेली लढा . आझाद गोमंतक दल आणि देशभक्त भारतीय यांचा सशस्त्र मुक्तीसंग्राम.
     लवेच्या गावी हेमवंतीबाई नाटेकर यांच्या वडिलांचा आश्रम होता . नाना काजरेकर व राजा वाकणकर तिथे गेले . त्यानी गुप्तपणे माहिती काढायला सुरुवात केली . २ माशिनगन्स, ६ स्टेनगन्स, २०० रायफल्स व सोबतीला भरपूर दारुगोळा असलेले सिंहवास, सेल्वासा ठाणे . विरुद्ध गावठी शस्त्रे घेतलेली पण प्रखर देशभक्तीने भरलेली १०७ मने . मनात एकच संकल्प . सावरकरांच्या शब्दांचा ' हे काय बंधू असतो जरी सात आम्ही । त्वस्थडीलीच दिधले असते बळी मी । ' विजय कोणाचा ?  शस्त्रांचा की देशभक्तीचा ?

     सैनिकांच्या ३ तुकड्या केल्या . ठाण्याच्या तीनही बाजूनी त्या पांगल्या . आमची आक्रमणाची वेळ जवळ येत चालली . मन फडफडू  झाले . हृदय धडधडू लागले . छातीचे ठोके कानामध्ये शिरू लागले . इशारा झाला आणि आम्ही पुढे सरकू लागलो . बाबाराव भिडे यांनी गणेश चतुर्थीचे एटोम बोंम दिले होते . पंचवीस पंचवीस पावलांवर ते लावायचे होते . बॉमची वात सारखी केली  . काडीपेटी काढली तर पाण्याने ओलीचिंब भिजलेली .
     करायचे काय ? दूरवर एक घर दिसत होते . त्या घराकडे गेलो . दारावर थाप मारली . एका माणसाने दार उघडले . समोर खाकी कपड्यातील बंदुक घेतलेला मी .  मला पाहताच तो पांढरा फटक.  धावायलाच  लागला . पेंट अडखळली एका दगडाला आणि घातला साष्टांग नमस्कार . तोंडावरच आपटला तो . खिशातली काडीपेटी पडली ती नेमकी माझ्यासमोर . ती घेऊन विनाविलंब तुकडीत सामील झालो .
     तीनही बाजूंना बंदुकांचे, शू S S , बोमांचे आवाज ऐकू येत होते . पोलिस ठाणे जवळ  येऊ लागले . बलिदानाच्या कल्पनेने अंग शहारून उठले . बाहु फुरफुरू लागले . वन्दे मातरम असे नुसते तोंडानेच म्हणत होतो . आज प्रत्यक्ष कृतीची वेळ होती . विवेकानंदांनी म्हटलेय ना ' उत्तीष्ठतः जागृत प्राप्य वरान्नीबोधत । '
     दीर्घ शिट्टी झाली . धाड धाड धाड ! झाडाआडून उद्या पडायला लागल्या . पोलिसांना काय करावे तेच समजेना . एक पोलिस धीर करून पुढे येऊ लागला . थांब ! नाना सोनावणे ओरडला . पोलिस थांबेना . काय झाले काही कळलेच नाही . क्षणार्धात घडले ते . नानांनी उडी घेतली ती खिडकीतून थेट त्या पोलिस स्टेशनाच्या आत . जपानी मेकची संगीन त्या शिपायाच्या छातीतून आरपार करत .
    रडत ओरडत सगळे शिपाई शरण मागत होते . बंदुका डोक्यावर घेऊन गुढग्यावरुन रांगत होते . प्राणाची भिक मागत होते . आम्ही त्यांना पकडले . दोरीने बांधले . एका खोलीत नेउन कोंडले . बाहेर आलो . विजयाच्या घोषणा देऊ लागलो . भारत मातेचा जयजयकार करू लागलो . धनाजी कुरुङ्गळे याने पोर्तुगीज झेंडा खाली घेतला . प्रभाकर सिनारीने तो मातीत टाकला . आपल्या बुटाच्या पायांनी तो त्याला तुडवू लागला . त्यावर नाचू लागला . साडेचारशे वर्षांच्या गोवेकरी रागाचे, आतल्या आत धुमसणाऱ्या प्रतीशोधाचे ते प्रकटीकरण होते .
     आम्ही रांगेत उभे राहिलो . आपला भारतीय तिरंगा वर चढविला . वारा वाहत होता . ध्वज फडकत होता . तन मन धन पूर्वक आम्ही गर्जत होतो . भारतमाता की जय ! भारतमाता की जय !

मुझे तुम तोड लेना वनमाली,
उस पथ पर देना फेंक ।
मातृभूमी पर शीश चढाने,
जिस पथ जाये वीर अनेक ।। 

      
     
     




No comments:

Post a Comment