Saturday, August 20, 2011

इन्द्र्पूजा सोडा, गोवर्धन पूजा धरा !

प्रत्येक समाजाच्या जीवनात अशी निर्णायक वळणे येतात .
त्या त्या वेळी ते ते महापुरुष योग्य असा निर्णय घेतात.
समाजाच्या योगक्षेमाची चिंता वहातात. त्यामागे आपली तपस्या पणाला लावतात.
म्हणूनच त्यांना  महापुरुष म्हणतात.

इंद्र्पूजेचा सण जवळ आला  होता. गोकुळात सगळीकडे धामधूम चालली होती.
सगळेजण आपापल्या पद्धतीने सणाची तयारी करीत होते.

बालगोपालात तर सण म्हणजे उत्साहाचे वातावरण.
बाल गोपालात सणाची चर्चा सुरु झाली.
बरोबर कान्हा ! पण गप्प गप्प ! विचारात बुडालेला.
" काय झाले रे ? " सगळे गोपाल विचारू लागले.

आणि कान्हाचे डोळे चमकले. एक वेगळेच तेज आले तिथे.
' गोवर्धन महाराज की जय ' तो गर्जला !

" मंडल " कान्हाने आज्ञा दिली. सगळे  गोल उभे राहिले.
कान्हा बोलू लागला, " सवंगड्यांनो, दरवर्षी आपण इंद्रदेवाची पूजा करतो.
पण हा आपला खरा देव आहे काय ? आपला खरा देव आहे हा गोवर्धन.
जो रोज आपल्याला  धारण करतो. आपल्याला मुक्तपणे भटकायला देतो.
आपल्या गायीगुरांना चारा देतो. जळणाला, इमारतीला लाकूड देतो.
ज्यामुळे गोकुळात पाऊस येतो. गोकुळ सुसंपन्न, वैभवी बनवितो.
इंद्रापेक्षा हा गोवर्धन हाच खरा देव. बोला " गोवर्धन महाराज की जय "

गोकुळात गोवर्धन पूजा अनोख्या डामडौलात पार पडली.
खऱ्या कृतज्ञतेची पूजा ! पण !

इंद्राला समजले. आपल्याला टाळून गोवर्धनाची पूजा केली गोपालांनी !
गोपाल मातले काय ? धडा शिकवायलाच हवा. आणि........
पाऊस सुरु झाला. खरा मुसळधार ! गडगडाट, विजांसह ! अविश्रांत !
गोकुळात पाणीच पाणी  होऊ लागले. महापूर! पाऊस थांबायचे नाव नाही. 
सगळ्यांच्या लक्षात आले इंद्रदेव कोपलाय. तो वेड्यासारखा कोसळतोय.
सगळे कान्हाला दोष देऊ लागले . बोलती कोण बंद करणार ?
पण कान्हाच तो. विचार केला नसेल का त्याने ?

सकाळी सगळे गोकुळ जमा झाले. गोवर्धानाच्या पायाशी गेले.
गोवर्धनाची प्रार्थना करीत ते त्याला म्हणाले,
' देवा, सत्याला स्मरून आम्ही तुझी पूजा केली.
यात आमचे चुकले काय ? आम्ही योग्य तेच केले.
या सत्याचे वहन करण्याची शक्ती आम्हाला दे महाराजा ! ' आणि ..........

आपली प्रतिरूप असलेली काठी त्यांनी उगारली, उंचावली !
गोवर्धनाच्या तळाशी घातली. कान्हाने काय केले ? गोवर्धनाचा जयजयकार केला.
आपली करांगुली उंचावली. गोवर्धनाकडे निर्देशली.
आणि हा हा म्हणता गोवर्धन उंचावला गेला.
कुठला पाऊस आणि कुठला महापूर ! " गोवर्धन महाराज की जय "

Thursday, August 18, 2011

तर लोकपालाची गरजच नव्हती !

सकाळची वेळ ! शिबू विद्यालयात गेला होता.
उठणे, नाश्ता, तयार होणे, नेहमीपेक्षा जास्त सतावले आज शिबुने.
वडिलांना  सांगायचे आज. 
पण मग मस्ती मुलांनी नाही करायची मग कोणी ?  

आई शिबुच्या खोलीत गेली. अस्ताव्यस्त पडलेला  पसारा आवरू लागली.
अकस्मात आईचे लक्ष त्याच्या कपाटाकडे गेले. कपाटातून मुंग्या येत होत्या.
आईने कपाट उघडले. शिळ्या झालेल्या पाचसहा चपात्या पुस्तकांमागे लपल्या  होत्या.
मुंग्या त्या चपात्यांना लागल्या होत्या .

शिबू शाळेतून आल्यावर आईने त्याला विचारले.
शिबू खरे सत्य बोलायचा. गहिवरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला., 
" आई तू रोज मला चपात्या द्यायचीस ना.
त्यातील दोन चपात्या मी त्या समोरच्या आईला ( भिकारणीला ) देत असे.
गेले दोन दिवस ती दिसतच नाहीये. कुठे गेली असेल ग ती ? "

आईने त्याच्या पाठीवरून हात फिरविला.
आपली  रेशमी शाल त्या भिकारणीच्या अंगावर टाकून स्वतः उघडा पडणारा
शिबू तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. टचकन दोन कढत अश्रू शिबुवर पडले.

सत्याचे प्रयोग करणारे  गांधी  सत्याला चिकटून जनभावनेला मान देते ,
शिबू ( सुभाषचंद्र बोस ) कॉंग्रेसचे  अध्यक्ष झाले  असते तर..........
लोकपाल विधेयकाची गरज पडली असती काय ?